Friday, June 22, 2012

श्री मनाचे श्लोक

॥ श्री मनाचे श्लोक ॥३२॥

अहल्या शिळा राघवें मुक्त केली।
पदीं लागतां दिव्य होऊनि गेली॥
जया वर्णितां शीणली वेदवाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥३२॥

अर्थ : - श्रीरामसामर्थ्याच्या पराक्रमगाथेमध्ये अहिल्येचे उदाहरण गाजलेले आहे. या कथेला वैयक्तिक, सामाजिक, तसाच आर्थिक आशयही आहे. हे तिन्हीही अर्थ राम-सामर्थ्य दाखवितात. पहिल्या आशयात गौतमाची पत्नी अहिल्या हिच्या संकटमुक्तीचे उदाहरण आहे. गौतम ऋषींची ही पत्नी इंद्राच्या मोहाला बळी पडली. गौतममुनी आश्रमात नसताना गौतमाचेच रूप घेऊन इंद्राने अहिल्येला फसविले. परत आल्यावर गौतमाने इंद्रालाही शाप दिला व अहिल्येलाही शाप दिला. त्यामुळे अहिल्या शिळा होऊन पडली. श्रीराम विश्वामित्राबरोबर मिथिलेला जात असताना विश्रामित्राने अहिल्येच ती कथा श्रीरामाला सांगितली आणि श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिल्या पुन्हा जिवंत झाली. या कथेचा दुसरा आशय असा की पापी माणसाला राम सामर्थ्य दूर ठेवीत नाही, तर त्याला पुण्यमार्गाने आणण्याचे प्रयत्न करते. या कथेचा तिसराही एक आशय आहे. तो आर्थिक आणि काहीसा रूपकात्मक आहे. अहिल्याचा अर्थ ‘न नांगरलेली जमीन’ असाही होतो. श्रीरामासारखा समर्थ पुरूष ज्या प्रदेशातून जातो, तो प्रदेश घातक जनावरांच्यापासून मुक्त होणार हे उघड आहे. प्राचीन काळी वस्ती अशीच वाढली. धैर्यवान पुरूष जंगलात दुर्गम भागात गेले. मग तेथे वस्ती झाली. मग लागवड झाली. समाजाची अर्थार्जनशक्ती वाढली. माणसे अधिक निर्भय, बलवान, समृध्द झाली. या अर्थानेही रामाचे पाय जेथे लालगे, त्या प्रदेशांचा उध्दार झाला असला पाहिजे. हा तिसरा अर्थही श्रीरामाचे समर्थपण सांगतो.

No comments:

Post a Comment